![]() |
चौल्हेर किल्ला |
चौल्हेर हा किल्ला देखणा आहे. भक्कम आणि वास्तुवैभवाने नटलेला आहे. नाशिकहून सटाणा, सटाण्याहून तिळवण येथे गेल्यानंतर जवळच वाडी-चौल्हेर हे पायथ्याचे गाव लागते. किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यावर पिठुरी अमावस्येला जत्रा भरते.
हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.
गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी.
बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत. उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायर्यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके, आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात. याशिवाय पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो. गडावरुन सातमाळ रांग व सेलबारी - डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. बालेकिल्याकडे जाणार्या डावीकडच्या वाटेवर चौरंगनाथाची व हनुमाना्ची मुर्ती आहे.
वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याशा पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो.
पठारावरुन वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. वाट संपल्यावर कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. त्या पायर्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो. प्रवेशद्वाराकडे जाणार्या कातळात कोरलेल्या पायर्यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. काही पायर्या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही.
या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. ह्या दरवाजा समोरुन गड माथ्यावर जाणारी वाट लागते. तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरुन हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो.
गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. पायर्या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदीर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे.