 |
छत्रपती शिवाजी महाराज |
महाराष्ट्राची भूमी ही उज्ज्वल अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक अणि सामाजिक परंपरा
सांगणाऱ्या भूमीपुत्रांची खाण आहे. सह्याद्री-सातपुडयांच्या रांगांनी, पवित्र अशा
महानद्यांनी आणि दुर्गम अशा गडकोटांनी बनलेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या अंगी
कर्तृत्व, धैर्य, शौर्य अणि शांती सहज दिसून येते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,
संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा, संत जनाबाई. अशा अनेक संतानी महाराष्ट्राच्या
आध्यात्मिक संस्कृतीची जडणघडण केली आहे. तसाच एक रयतेचा राजा होऊन गेला त्याचे नाव
होते शिवाजी.
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले
कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष
करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य
शिवाजी राजांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की,
ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे,
सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला
त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ
पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता. जगातील थोर पराक्रमी आणि
मुत्सद्दी राजांची यादी जर समोर धरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा
मोहरा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन बोनापार्ट, सिकंदर, किंवा दुसरे कोणतेही नृपती
उदाहरणार्थ घेतले तरी प्रत्येक नृपतीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कांकणभर अधिक
आहेत आणि हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते.
त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती
झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली. अनेक मोहीमा काढून शिवरायांनी
शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच
व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.
छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ,
सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखुनच आपल्या जवळ केली होती.
महाराजांनी सतत सज्जन व्यक्ती, आपले सेनानी, स्त्रिया, संत-महंत यांचा सन्मान केला
त्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले. शिवाजी
महाराजांच्या लष्कराच्या पाठीचा कणा होता, तो म्हणजे लष्करात कुणबी, मराठे,
ब्राह्मण, मुसलमान, न्हावी, महार, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर, वैगेरे ५६ जातीचे
लोक होते. शिवरायांचे सैन्य राष्ट्रीय होते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर
भारतातील सर्व जातीतील गुणवंतांना शिवरायांच्या सैन्यात प्रवेश मिळे. माणसांची पारख
करूनच त्यांचा सैन्यात समावेश केला जाई.
अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार
करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले मात्र ते करत असताना महाराजांनी कधीही दुसऱ्या
धर्माचा द्वेष केला नाही. शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी
तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे. शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व
परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविश्वास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर
असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा,
असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्या अर्थाने
उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक
मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर ७०० हून
अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत.
महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता, “वेग”. तूफान वेग आणि त्यात
हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले
नाहीत. सर्व दुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन
वाट चोखाळली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या
युद्धपद्धतीतून वगळून टाकल्या. हेच ते महाराजांचे वेगळेपण. “जे जगाने केले ते
महाराजांनी कधीच केले नाही अन् जे महाराजांनी केले, ते जगाला कधीच करता आले नाही.”
म्हणून जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते.
शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा
असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती
कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात
कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले.
संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी
राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका,
विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत
परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या
सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.
आपल्या प्रभावी
व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने त्यांनी राजकीयदृष्ट्या
स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली.
कौशल्य, चातुर्य अणि साहस या गुणांनी त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक
शक्ती स्वराज्य स्थापण्यासाठी एकत्रित केल्या त्यामुळे ते आपल्या काळातील
युगप्रवर्तक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारीत्र्य साधेपणा, कनवाळूपणा,
स्त्रियांबद्दल असणारा भक्तीभाव, त्यांची धार्मिक वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या
तळागाळातील जनतेमध्ये महाराज अवतारी पुरुष असल्याची भावना निर्माण झाली होती कारण
महाराजासारखा धर्मनिरेपक्ष राजा या देशात झालाच नाही.
‘सैन्यावाचून राज्य धन अणि
पराक्रम प्राप्त होत नाही’ महाराजांनी आपल्या लष्कराची आणि आरमाराची उभारणी हे
सुत्र डोळ्यासमोर ठेवूनच केली. आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला
नि:पक्षपाती न्यायदान करणे, महसूल पध्दतीत सुसुत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन
देणे, आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सैन्यदल उभारणे, किनारपट्टीवर
पहारा करण्यासाठी आणि व्यापारासाठी आरमार उभारणे अशी विविध प्रकारची छत्रपती शिवाजी
महाराजांच्या कार्यक्षम आणि कारभाराची वैशिष्टये होती.
स्त्री ही कुठलीही असो,
प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार
छत्रपतींनी रयतेला दिला. शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी
जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून
तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा
आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. परस्त्रीविषयी महाराजांच्या
मनात नितांत आदर होता.
शिवाजी महाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच
राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना
करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी
पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज
सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ
बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते. महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात
आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही
व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते.
विशेष म्हणजे
अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले
सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ
ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव
स्वराज्याच्या रुपात पाहत होती. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण
केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न
ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट
आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान
युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या
महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.
छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट
राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या
कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा
मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या
जनतेचं त्याच्याबद्दलच प्रेम बघून भारावून गेले असते. पण त्याचबरोबर देशात
चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली बघून उदास हि झाले असते. अशा ह्या थोर
राज्याला माझं शत शत नमन.